सर्वसामान्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात : आरोग्यमंत्री राजेश टोपे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात, यासाठी सर्व प्रकारचे खास अधिकार दिलेले आहेत. हा आजार सामान्य नसून जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा वेळेवर मिळाव्यात. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठकीत दिले. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार सुरेश धस, राज्याच्या आरोग्य विभागाच्या वॉररुम प्रमुख डॉ. अर्चना पाटील, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश खापर्डे, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, जिल्ह्यात अ‍ॅन्टीजन तपासणी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने एकाच कंपनीला नेमले असून तपासणीचा दर 450 रुपये ठरविलेला आहे. एक हजार लोकसंख्येच्या मागे तीन तपासणी करण्याचे प्रमाण असून जिल्ह्यात 10 हजार न्टीजनची आवश्यकता आहे. तसेच क्वॉरंटाईन सेंटरची देखरेख करण्याची जबाबदारी विभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात यावी. क्वॉरंटाईन सेंटरची संख्या अपुरी पडल्यास मंगल कार्यालय हॉल हे ताब्यात घेऊन त्याचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच क्वॉरंटाईन उपचार घेत असलेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यांना अंडी व दूध आदी खाद्यपदार्थ कोविडच्या प्रोटोकॉल प्रमाणे द्यावेत. विशेष म्हणजे या रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे. यासाठी चांगल्या केटरची नेमणूक करावी व क्वॉरंटाईनची स्वच्छता राखण्याबरोबरच सदरील सेंटरचा फोटो काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा व त्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी. त्यासाठी पैशाची अडचण भासू दिली जाणार नसल्याचा निर्वाळाही टोपे यांनी यावेळी दिला. या बैठकीस आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.