नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विश्वास कसा ठेवायचा? पाकिस्तानचे पंतप्रधान पुलवामा घटनेवर दोन शब्द बोलले नाहीत, निषेध केला नाही. पुलावामा घटनेचा निषेध करण्यासाठी पुरावे लागतात का? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते आज एका हिंदी चॅनेलच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय वायुसेनेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या दरम्यान तणावाचे वातावरण आहे. तसेच शांततेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून भारतीय वैमानिकाची सुटका करण्यात येत आहे, असे विधान गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्यानंतर आज अमित शहा यांनी हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी हे सवाल केले. इम्रान खान यांची मजबूरी असू शकेल हे आम्ही देखील मानतो. पण निषेधाचे दोन शब्द देखील ते बोलू शकत नाही इतक्या कोणत्या दबावाखाली ते आहेत, असेही शहा म्हणाले.
तसेच त्यांनी विरोधी पक्षांच्या ठरावाला देखील लक्ष्य केले आहे . ते म्हणाले जगभरातून भारताला पाठिंबा मिळत असताना विरोधी पक्षांनी आपल्याच सरकारच्या विरोधात ठराव करणे, हवाई हल्ल्यावर शंका उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे, असे ही ते म्हणाले आहेत.