नीरव मोदीच्या अटकेमुळे चौकीदाराचा प्रभाव दिसला

मुंबई : वृत्तसंस्था – हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या निरव मोदीला लंडनमध्ये बुधावारी अटक झाली. नीरव मोदीच्या अटकेमुळे देशाचे चौकीदार किती सावध, कार्य़क्षम आणि प्रभावी आहेत हे दिसून येते, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

नीरव मोदी याला अटक झाल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारमधील अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. पात्रता नसताना वशिल्याने बँकांकडून हजारो कोटींची कर्ज देणे आणि नंतर ती बुडवणे हा मोठा कर्ज घोटाळा काँग्रेस सरकारच्याच आशिर्वादाने झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निरव मोदी याच्या जबाबात कोणी आणि कशी वशिल्याने कर्ज दिली आणि त्याने कोणाला कसा लाभ करुन दिला हे स्पष्ट होईल. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांनाच याचा जाब द्यावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिमानाने आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगतात. त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केल्यामुळे अनेक आर्थिक गुन्हेगारांना देशाबाहेर पलायन करावे लागले. पण हे आर्थिक गुन्हेगार परदेशात आश्रयाला गेले तरी मोदी सरकारने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रभावी पावले उचलली. नीरव मोदीची अटक हे मोदी सरकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाईचे यश आहे.