‘राज्यातील 3 अंकी नाटकावर भाजपचं लक्ष’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज भाजपच्या ग्रामीण आणि शहरी आमदारांची बैठक पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना संबोधित केलं. यात भाजपच्या 90 हजार बुथवर भाजपच्या नेत्यांची संघटनात्मक निवडणूक आम्ही घेणार आहोत असा निर्णय यात झाला. राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपंच लक्ष आहे असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले की, “आताच आमच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर यात चर्चा झाली. भाजपच्या 90 हजार बुथवर भाजपच्या नेत्यांची संघटनात्मक निवडणूक आम्ही घेणार आहोत. यात भाजपचे ग्रामीण आणि शहरी आमदार, विधानसभा सदस्य अशा सर्वांचाच समावेश असेल. राज्यात सध्या सत्ता स्थापनेचं तीन अंकी नाटक सुरू आहे. या नाटकावर भाजपचं लक्ष आहे.” असे म्हणत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यातील अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही राज्यात याबाबत दौरा करणार आहोत” असेही ते म्हणाले.

Visit : Policenama.com