‘मंत्री बनल्यानं शहाणपण येत नाही, नया है वह’ ! फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर ‘निशाणा’

मुंबई : वृत्तसंस्था – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री बनल्यावर शहाणपणा येत नसतो. नया है वह, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईतली कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना ‘नया है वह’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतं त्यांना ते मंत्री बनव आहेत. त्यामुळे मंत्री बनल्याने शहाणपण येतेच असं नाही. ठिक आहे ते नवीन आहेत. बोलत आहेत. बोलू देत. माझ्या सारख्या माणसानं त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये, नया है वह, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. सध्या आमचा जोर फिट राहण्यावर आहे. राज्याला कोरोनामुक्त करण्यावर आहे. मात्र, विरोधी पक्षनेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त आहेत, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर फडणवीस यांनी असा टोला लगावला.

शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात शरद पवार यांची मुलाखत सुरु आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, WWF ची कुस्ती तुम्हाला माहिती आहे का ? पूर्वी तशीच नुरा कुस्ती व्हायची. त्याला मॅच फिक्सिंग असं म्हटल जायचं. आता तिच फिक्सिंग सुरु आहे. त्यांची मॅच फिक्सिंग संपू द्या. योग्यवेळी त्यावर मी प्रतिक्रिया देईनच, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधक सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काही तथ्य नसल्याचंही ते म्हणाले. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचं आणि रडल्याचं नाटक करायचं, अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपलं अपयश झाकण्यासाठीच ही पद्धत अवलंबली जाते. सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरु आहेत. कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.