राज्याचे गृहमंत्री ‘वाचाळवीर’, भाजप नेत्याची जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळच हाणून पाडला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यावर आता भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहत. त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, याची माहिती जनतेपासून का लपवून ठेवली ? या गृहमंत्र्यांचे आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दोन महिन्यात एक इंचही पुढे सरकता आले नाही. त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं ? असा सवाल त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते अनिल देशमुख ?

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा खुलासा केला होता. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत क्ही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहेत. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली होती.