मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत ‘हे’ 15 ठराव, आता सरकारची ‘परीक्षा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –    मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाला आहे. राज्यात आंदोलनं केली जात आहेत. तर दुसरीकडे आज (बुधवार दि 23 सप्टेंबर) कोल्हापुरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

गोलमेज परिषदेतील एकूण 15 ठराव –

1) मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

2) मराठा समाजाच्या मुलामुलींना चालू आर्थिक वर्षापासून फी परतावा मिळावा.

3) केंद्र सरकारनं आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.

4) महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.

5) सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.

6) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.

7) राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृहं तयार करावीत.

8) मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

9) मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.

10) राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करावं.

11) स्वाभिमान आयोगाची अंमलबजावणी करावी ही मागणी

12) अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम तातडीनं सुरू करावं.

13) राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.

14) कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी.

15) राज्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

मराठा समाजाची लढ्याची घोषणा

गोलमेज परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची आणि आरक्षणाबाबतच्या लढ्याची घोषणा केली जाणार आहे. मराठा समाजाच्या आजच्या या गोलमेज परिषदेनंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचं आयोजन केलं आहे. मराठा समन्वय समाजाच्या वतीनं कोल्हापुरात महाराष्ट्रातील 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. अनेक आंदोलनं, 58 मूक मोर्चे, आणि 50 मराठा बांधवांचं बलिदान एवढ्या मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं. परंतु आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानं आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातील मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी आणि शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत. हेच कारण आहे की, मराठा समाजात असंतोष पसरला आहे. राज्यात विविध संघटना आता निषेध करताना दिसत आहेत. विविध आंदोलनही केली जात आहेत.