CM उध्दव ठाकरे चक्क वही अन् पेन घेऊनच बसले, PM मोदींना दिला कामाचा ‘लेखाजोखा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना संकटाच्या काळात भाजपचे राज्यातील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करत आहेत. ते आजवरचे सर्वात निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत, ते मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पडत नाहीत असे अनेक आरोप करत आहेत. कोरोनासारख्या महासंकटाला तोंड देत विकासाची कशी कामे केली याचा लेखजोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वाधिक संसर्गाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिली. कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे,याचा तपशील त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केला. सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी तातडीने घेतलेल्या निर्णयांची माहितीही उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने केलेल्या कामाचा तपशील पुढीलप्रमाणे :

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी :

– राज्यात ५५ हजार आरोग्य पथके तयार करण्याचे ध्यये होते पण त्यापेक्षा जास्तच ५९ हजार पथके तैनात करण्यात आले आहेत.

– ही मोहीम सुरू झाल्यापासून राज्यात ७० लाख ७५ हजार ७८२ घरांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये २.८३ लाख ६३ हजार लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात आले.

– या मोहिमेत ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती सापडले तर ७ लाख ५४ हजार व्यक्तींना विविध व्याधींनी ग्रासले आहे.

राज्य सरकारने घेतलेले काही महत्वाचे निर्णय :

– राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला.

– खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे.

– कोरोनाच्या अनुषंगाने करावयाच्या चाचण्यांचे दर नियंत्रित करण्यात आले.

– तज्ञ डॉक्टर्सचा राज्यस्तरीय टास्क फोर्स तयार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातही डॉक्टर्सचे टास्क फोर्स स्थापन करण्यात आले.

– गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या नेमण्यात आल्या.

– ऑक्सिजनच्या उत्पादनावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आता एकूण ऑक्सिजन – उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.

– ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे.

– ऑक्सिजन उपलब्धतेसाठी व येणाऱ्या अडचणींसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.

– गेल्या महिन्यात राज्यात १८ RTPCR चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. सध्या राज्याची चाचणी क्षमता (प्रतिदिन) ८० हजार इतकी झाली आहे.

– लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. Rapid Antigen Test निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य RTPCR चाचणीसाठी पाठविला जातो.

– RTPCR चाचणी कीट अतिशय स्पर्धात्मक किंमतीत खरेदीस सुरुवात केली.

बेडची उपलब्धता

– मार्च २०२० मध्ये ७७२२ बेडस, आयसीयु बेडस ३०९१ आणि ११४३ व्हेंटीलेटर्स होते आज एकूण – उपलब्ध बेडची संख्या ३.६० लाख एवढी वाढवण्यात आली आहे.

– राज्यात क्वारंटाइनसाठी ३५३ संस्थांमध्ये १६,१९२ खाटांची सोय होती. सध्या १०१० संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये १,२४,२८४ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यात आले

– अनलॉक प्रक्रियेनंतर राज्यात ९५ टक्के उद्योग पुन्हा सुरू झाले. त्यामुकळे अर्थचक्राला गती मिळाली आहे.

– सुमारे ६ हजार जणांना महाजॉब्स या पोर्टलद्वारे नोकरी देण्यात आली आहे.

– विकेल तेच पिकेल या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभमिळाला आहे. शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होणार आहे.

– १९,४५० कोटीची कर्जमुक्ती करण्यात आली. ३१.८९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत रु १९ हजार ४५० कोटी जमा करण्यात आले.

– सर्वसामान्यांना घरासाठी ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

– ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या २४ टाऊनशिपची योजना तयार करण्यात येत आहे.

– गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना पुन्हा सुरु करण्यात आली असून १०० टक्के अनुदान म्हणून २००० रुपये रोख रक्कम आणि २००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत.

– आदिवासी मुले आणि महिलांना अतिरिक्त दुधापासून तयार झालेली भुकटी ६ लाख ५१ हजार मुलांना तसेच १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना १ वर्षाकरीता मोफत देण्यात येणार आहे.
रोहयोची कामे वेगाने सुरू आहेत.

– महिला आर्थिक विकास महामंडळाकडून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचतगटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ सुरु करण्यात आला आहे.

शाळा बंद पण शिक्षण सुरू

– गुगल क्लास रुम/ तसेच टाटा स्काय, जिओ, दिशा गुगल क्लास रुम/ तसेच टाटा स्काय, जिओ, दिशा ॲप या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे.

– राज्यातील परिक्षा प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन देखील केले आहे.

पर्यटनाला चालना देण्यात आली

– ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला आहे.

– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण आहे.