Coronavirus : 6 जिल्ह्यातील 13 % लोकांना कोरोना, उपचाराविना झाले बरे !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या ६ महिन्यात राज्यातील फक्त सहा जिल्ह्यांतील तब्बल १३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि कुठलाही उपचार न करता ते बरे देखील झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यातील २५.९ टक्के तर सर्वात कमी बीड जिल्ह्यातील ७.४ टक्के लोकांचा समावेश आहे. २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान आयसीएमआर (इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च) कडून बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव व सांगली या सहा जिल्ह्यांत एक ‘सेरो सर्व्हे’ करण्यात आला. त्यामध्ये २६८१ लोकांचे सॅम्पल घेण्यात आले. त्यातील ३४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याची टक्केवारी १३.१२ एवढी आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी मे महिन्यात भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेकडून या ६ जिल्ह्यांत पहिला सेरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १५९३ लोकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यामध्ये २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ऑगस्ट मध्ये दुसरा सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये ६० गावांमधील तब्बल २,६८१ लोकांचे सॅम्पल घेण्यात आले यामध्ये ३४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.आयसीएमआरचे बलराम भार्गव यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना याचा अहवालही दिला आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे
आयसीएमआरकडून बीडसह राज्यातील सहा जिल्ह्यांत आयसीएमआरकडून सेरो सर्व्हे करण्यात आला होता. समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या बाबतीत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पालनदेखील करणे गरजेचे आहे. मला काही होत नाही हा समाज पहिला मनातून काढून टाका. काळजी करू नका, पण काळजी घ्या.
डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

एक नजर आकडेवारीवर
जिल्हा          सॅम्पल   पॉझिटिव्ह   टक्का
बीड              ४४३        ३३           ७.४
परभणी         ४८०        ७३           १५.२
नांदेड            ४३९         ४३           ९.८
सांगली         ४६७        ५५           ११.७
अहमदनगर   ४४७       ३९           ८.७२
जळगाव       ४०५       १०५          २५.९
एकूण २६८१ ३४८ १३.१२