ठाकरे सरकार राज्यातील हॉटेल्स सुरू करण्याबाबत मोठया निर्णयाच्या तयारीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे स्थान मोठे आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला गती देण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येत असून ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून हे संकेत दिले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असेही सांगितले. मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन, पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी, जिम देखील बंदच ठेवले आहेत. कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हॉटेल सुरु करण्यास काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
स्वयंशिस्तही महत्त्वाची – आदित्य ठाकरे

हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमची वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.