देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागाचा दौरा, बारामतीपासून दौऱ्याला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत.

देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबरला बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडा इत्यादी ठिकाणी दोरा करुन ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसऱ्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसऱ्या दिवशी (दि.21) हिंगोली, जालना, औरंगाबादचा दौरा करणार आहेत. या तीन दिवसात 9 जिल्ह्यामध्ये सुमारे 850 कीमीचा प्रवास ते करणार आहेत.

शरद पवार 2 दिवसीय दौऱ्यावर

शरद पवार दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा आणि उस्मानाबाद या भागांना भेटी देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 18 व 19 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचा हा पाहणी दौरा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा आहे.