‘कारस्थान केव्हापर्यंत सहन करणार ? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं’

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह सर्वच जण तसे काही होणार नसल्याचे सांगत असतानाच, आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला असून, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खडसेंनी सांगितले. ज्या पक्षासाठी आजवर आपण कष्ट केले तेथेच आपल्या विरुद्ध कटकारस्थाने होत असतील तर ते कुठवर सहन करणार, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. ते मुक्ताईनगर येथे वार्ताहरांना बोलत होते.

खडसे म्हणाले, ‘मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वावर आपला आक्षेप नाही. पक्षाच्या ध्येयधोरणांवर देखील आपले आक्षेप नव्हते. मात्र, अंजली दमानिया यांनी माझ्याविरोधात विनयभंगाचा खोटा खटला कोर्टात दाखल केला. पोलीस तयार नसताना फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. याबाबत फडणवीस यांना विचारला असता, ती महिला प्रचंड गोंधळ करत होती म्हणून नाइलाजाने मला आदेश द्यावे लागले, असे उत्तर मला मिळाले. सुदैवाने पंधरा दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली.’

‘पीएने लाच मागितल्याचा कथित प्रकरणी माझ्यावर नऊ महिने पाळत ठेवली गेली. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर सुद्धा आपण चार वर्षे वाट बघितली. मात्र, सातत्याने आपल्यावर अन्याय करण्यात आला, असे खडसे म्हणाले. माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडला. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला राजकीय जीवनातून संपवण्याचे कारस्थान सुरु झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी’ असे ज्या वेळेस मी म्हटले तेव्हापासून हे षडयंत्र सुरु झाले. माझ्या मागे अनेक प्रकरणे लावण्यात आली,’ असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवले – फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबद्दल तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला हवे होते. तद्वतच, एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावरती बोलायचे नाही. अशा वेळी कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष आहे, तो कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपसोबत आहे, असे सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं.