शेतकऱ्यांचा 70 रुपये किलोचा कांदा किरकोळ बाजारात 120 रुपये किलोने होतेय विक्री

लासलगाव – मेट्रो शहरामध्ये कांद्याने शंभरी ओलांडताच केंद्र सरकार खडबडून जागे होत कांदा आयातीवरील निर्बंध शिथिल केले.देशभर वधारलेला कांद्याचा भाव उतरणीला लागावा यासाठी केंद्र सरकारने कांदा आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या कांद्याला आज ७०५० रुपये असा भाव मिळाला.होलसेल बाजारात ७० रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात १२० रुपये प्रति किलोने विकला जात आहे.

नवा कांदा येण्यास अजून २ महिना लागणार असल्याने तो पर्यंत उन्हाळ कांद्यावर विसंबून रहावे लागणार आहे. देशभरात दररोज ५० हजार टन कांदा खाल्ला जातो. त्या तुलनते देशात आवक होत नसल्याने मागणी व पुरवठ्याची तफावत असल्याने कांदा भाव खात आहे.

किरकोळ दरात वाढलेले दर सरकारची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे यामुळे कांद्याच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी आयात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे दिली. कांद्याच्या निर्यातीवर याआधीच बंदी घालण्यात आली आहे. आयात निर्बंधांमध्ये सवलत दिल्यामुळे परदेशातून आलेला कांदा देशी बाजारांत पुरेसा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल आणि बाजार भाव कमी होण्यास मदत होणार आहे.

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर २८४ वाहनांतुन कांदा आवक होऊन कांद्याला कमीत कमी १६०१ सरासरी ६२०० तर जास्तीत जास्त ७०५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.