केंद्राचा निष्काळजीपणा चिंताजनक, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कोविड लसीची रणनीती असायला हवी होती, परंतु अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही, असे गांधी म्हणाले.
A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now.
But there are still no signs of it.
GOI’s unpreparedness is alarming. https://t.co/AUjumgGjGC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2020
केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी 14 ऑगस्ट रोजीही यासंदर्भात ट्विट केले होते. भारत कोरोना लसीचे उत्पादन करणार्या देशांपैकी एक असेल. परंतु ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सर्वसमावेश रणनीती आखायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशभरात मागील 24 तासांमध्ये तब्बल 75 हजार 760 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 1 हजार 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता 33 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 25 लाख 23 हजार 772 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 472 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.