‘राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास ते शंकराचे अवतार’ : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – राहुल गांधींना भगवान शंकरासारखं विष दिलं पाहिजे. विष पाजल्यानंतर ते निवडणूकीपर्यंत जिवंत राहतात की नाही ते पाहू, असं वादग्रस्त विधान गुजरातच्या रुपाणी सरकारमध्ये मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनी केलं आहे. लोकसभा निवडणूका जवळ येत असतानाच राजकीय नेत्यांकडून आरोप करताना वादग्रस्त विधानं समोर येताना दिसत आहेत.

राहुल गांधी याच्यावर निशाणा साधताना वसावा म्हणाले की, “राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार समजू. राहुल गांधींना भगवान शंकरासारखं विष दिलं पाहिजे. विष पाजल्यानंतर ते निवडणूकीपर्यंत जिवंत राहतात की नाही ते पाहू.” सोशल मीडियाच्या माध्यमातून वसावा यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. राहुल गांधींसंदर्भात त्यांनी आक्षेापर्ह वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधीवर टीका करताना वसावा यांनी राहुल गांधींची शंकराशी तुलना करणाऱ्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने सोशल मीडियावरून राहुल गांधी यांना शंकराचे अवतार म्हटले होते. हाच मुद्दा धरून गणपत वसावा म्हणाले की, “राहुल गांधी भगवान शंकराचे अवतार आहेत. तुम्ही सेना आणि जवानांकडे पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे मागत आहात. तर दुसरीकडे तुम्ही राहुल गांधींना साक्षात शिवाचे अवतार असल्याचं सांगत आहात. भगवान शंकर लोकांचं दुःख दूर करण्यासाठी विष प्यायचे, तुमच्या नेत्यालाही ५०० ग्राम विष पाजा, निवडणूकीपर्यंत जिवंत राहिल्यास शिवाचे अवतार समजू.” असे वसावा म्हणाले आहेत.

दुसरीकडे कालच कर्नाटकातील एका जनसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा यांनी ‘मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्यांच्या कानशिलात लगावा’ असं विधान केलं होतं. भाजपा प्रवक्ते आणि आमदार सुरेश कुमार यांनी शिवालिंग गौडा यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. मोदींनी जशी आश्वासनं दिली होती, तसे कोणाच्या खात्यात आतापर्यंत १५ लाख आले आहेत काय? जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा असेही गौडा म्हणाले होते.