‘कोरोना’च्या महामारी दरम्यानच देशात उष्णतेचा ‘कहर’, ‘या’ 5 राज्यांना दिला ‘रेड’ अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट सुरु असताना आणखी दुसरे एक संकट समोर आले आहे. हवामान खात्याने उत्तर भारतातील राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणच्या बऱ्याच भागात तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. काही ठिकाणी तापमान 47 अंशांपेक्षा जास्त देखील असू शकतं. आयएमडीने रविवारी (दि.24) दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन ते तीन दिवस ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. दुपारी बाहेर जाणे टाळा.

हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की, विभागानं पूर्व उत्तर प्रदेशातही उष्माघातामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत काही भागातील तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात प्रथमच उष्माघातामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे. लोकांनी दुपारी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण यावेळी उष्णता सर्वाधिक असेल. 28 मे नंतरच उष्णतेपासून सुटका होऊ शकते. कारण पश्चिमी भागातील हवामानाच्या बदलामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ भागात उष्णतेची लाट
येत्या पाच दिवसांमध्ये पंजाब, चंदीगड, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागात कडक उष्णतेचा तडाखा असणार आहे. तर छत्तीसगड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, विदर्भ, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यामन, रायलसीमा आणि उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या भागात देखील उष्णतेची लाट येऊ शकते. कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस तापमान असतं आणि सामान्य तापमान 4.5 डिग्री सेल्सियसवरून 6.4 डिग्री सेल्सियसपर्य़ंत वाढतं तेव्हा उष्माघाताची स्थिती घोषित केली जाते. मैदानी क्षेत्रांसाठी लूची परिस्थिती उद्भवते तेव्हा जास्तीत जास्त तापमान 45 डिग्री असते आणि तीव्र उष्णता 47 डिग्री त्याहून अधिक असते.

सनस्ट्रोक टाळण्यासठी काही टिप्स
1. लॉकडाऊन दरम्यान जास्त काळ घरातच थांबा
2. दिवसातून कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या
3. रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका, उष्माघाताचा धोका असतो.
4. दुपारी 12 ते 3 यावेळेत घराच्या बाहेर पडू नका
5. घराबाहेर पडताना तोंड, डोके व्यवस्थित झाकून घ्या
6. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली आवश्य जवळ ठेवा
7. सूती कपडे घाला, त्यामुळे घाम वाळण्यास मदत होते.
8. उचमळणे, घसा कोरडा पडणे अशी उष्णतेची लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.