मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करा, नालेसफाई केली का हातसफाई ?, भाजपचे जोरदार टिकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत तर काही लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. कालच्या एकाच दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या नालेसफाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेला धारेवर धरताना, मुंबईमध्ये 113 टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली ? असा प्रश्न विचारला आहे. तसेच ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करणे आवश्यक होती तशी झालेली नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याची टीका त्यांनी केली.

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे नैसर्गीक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येक 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपने राज्य सरकारकडे केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत एक प्रकारचं वादळच आलेलं आहे, असंही भाजपनं म्हटलं आहे.