‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ डोवाल भेटल्यावर ‘मकरज’चे ‘मौलाना’ कुठं गेले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा ‘सवाल’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणकंदन सुरु झाले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावरुन महाराष्टाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला आम्ही परवानगी दिली नाही. मात्र, निजामुद्दीन पोलीस स्टेशनच्या शेजारी झालेल्या या कार्यक्रमाला का थांबवले नाही? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तब्लिगी जमातचे मौलाना यांना का भेटले? त्यानंतर मौलाना कुठे गायब झाले? अशावेळी दिल्ली पोलीस आयुक्त काय करत होते? असे गंभीर प्रश्न अनिल देशमुख यांनी केंद्राला विचारले आहे. नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लिगी जमातचा मर्कज कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामुळे देशातील अनेक राज्यात कोरोनाचा प्रसार झालाय. यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राला काही प्रश्न विचारले आहेत.

अनिल देशमुख यांचे प्रश्न
मुंबईच्या उपनगर वसई येथे 15 आणि 16 मार्चला 50 हजार तब्लिगी जमणार होते. त्या आयोजनाला महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने परवानगी नाकारुन रोखले होते. केंद्रात गृहमंत्रालयाने निजामुद्दीन, दिल्लीमध्ये तब्लिगी मर्कजच्या कार्यक्रमाला परवानगी का दिली.?
निजामुद्दीनच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असे असूनही या आयोजनाला का थांबवलं नाही? याच्यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का? ज्या पद्धतीने या मर्कजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यांत झाला, ह्याकरता केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रात्री दोन वाजता मर्कजमध्ये का पाठवलं? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे आहे की दिल्ली पोलिसांचे? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तब्लिगी जमाचे मौलाना यांच्यात रात्री दोन वाजता काय गुप्त चर्चा झाली? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त या दोघांनी याविषयावर बोलणे का टाळले? अजित डोवाल यांनी भेटल्यानंतर मौलाना साहेब कुठे गायब झाले? आता ते कुठे आहेत? कोणाशी याचे संबंध आहेत? मर्कजच्या आयोजनाची परवानगी तुमची? कार्यक्रमाला रोखले नाही तुम्ही?