संतापजनक ! अति क्षुल्लक कारणामुळं पतीनं केला गर्भवती पत्नीचा खून

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – लखीमपूर खिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने गरोदर पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी बबलूला सकाळी साडेपाच वाजता आपल्या कामानिमित्त बाहेर जायचं होत. तेव्हा त्याने पत्नी रेणूला चहा बनविण्यास सांगितला. रेणूने चहा बनवला पण तो बबलूला पसंत आला नाही, म्हणून बबलू आणि रेणू यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो तेथून फरार झाला.

क्षुल्लख कारणावरुन पत्नीला मारहाण
बबलू आणि रेणूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू ६ महिन्यांची गरोदर होती. बबलूचा स्वभाव हा रागीट स्वरुपाचा होता. तो अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींवरुन रेणूशी वाद घालायचा. आज सकाळी तो संतापला आणि त्याने ही हत्या घडवून आणली. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला.

घटनस्थळावरुन पळून गेलेल्या तिच्या पतीच्या शोधात पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. या प्रकरणी माहिती देताना पोलीस अधीक्षक पूनम यांनी म्हटलं की, चहाच्या वादातून बबलूने आपली पत्नी रेणूची हत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, आरोपीस लवकरात लवकर अटक करण्यात येईल.