“भारत स्वातंत्रकाळानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे : रघुराम राजन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्लॉग लिहीत “भारत स्वातंत्रकाळानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विरोधी पक्षाची व अर्थ क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेऊन मदत घेतली पाहिजे” असे मत व्यक्त करत, सरकारला पुढील संकटाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

२००८-०९ साली आलेल्या जागतिक संकटाची नांदी रघुराम राजन यांनीच सर्वात आधी दिली होती. त्यांनतर जगातील अनेक अर्थतज्ञांनी त्यावर आपले विचार स्पष्ट केले होते. आताही रघुराम राजन यांनी सरकारला पुढील आर्थिक संकटनासंबंधी जाग करण्याचा प्रयत्न केला आहे. रघुराम राजन यांनी ‘Perhaps India’s Greatest Challenge in Recent Times’ या शिर्षकाने आपला ब्लॉग प्रसिद्ध केला आहे.

रघुराम राजन यांनी ब्लॉग मध्ये म्हटलं आहे की, स्वातंत्र मिळाल्यापासून भारतासमोर हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीवेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, तेव्हा कामगार कामावर जात होते. कंपन्या आधीच्या नफ्यामुळे मजबूत होत्या. देशाची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होती आणि सरकारची अर्थप्रणालीही निरोगी होती. पण आता जेव्हा आपण कोरोना संसर्गाशी लढा देत आहोत तेव्हा यापैकी कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही” असं रघुराम राजन यांनी स्पष्टपणे सांगितलं.

अनुभवी लोकांची मदत सरकारने घ्यावी.

सद्य स्थितीत सरकारला खूप काही उपययोजना करण्याची गरज आहे. सरकारने ज्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे. अशा लोकांना बोलवलं पाहिजे. भारतामध्ये अनेक असे लोक आहेत जे सरकारला या परिस्थितीमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात. सरकारने राजकारणाच्या सीमा ओलांड़ून विरोधी पक्षाची ज्यांच्याकडे जागतिक आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा अनुभव आहे, अशा काही लोकांची मदत घेतली पाहिजे, अस ते म्हणाले.

चाचण्या वाढवण्याची गरज.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यसाठी आपल्याला प्राथमिक चाचण्यांची व्यापकता वाढवण्याची गरज आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाईनची कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन हे पाहिलं पाऊल आहे. यामुळे सरकारला तयारी करण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे. पण सरकारने अजून वेग वाढण्याची गरज आहे. असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

देशभरात रुग्णांच्या संख्येत वाढ.

दरम्यान, देशभरातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ४ हजार २८१ वर पोहचली असून, १११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४१ जण बरे झाले आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात ९०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ११४५ रुग्ण तबलिगी मरकजशी संबंधित आहे. तर गेल्या २४ तासात ३२ लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे.