जातीनिहाय जनगणना होत नसल्यानं OBC समाज हक्कापासून वंचित : ओबीसी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  ओबीसी(OBC)समाजाची जातीनिहाय जनगणना होत नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित राहिला आहे, असे मत अखिल भारतीय ओबीसी(OBC) महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार यांनी व्यक्त केले. ओबीसींना मोठा इतिहास आहे. मात्र, जाणीव नसल्याने आजवर ओबीसी समाजाला डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी महासभा अधिवेशनात बोलताना ललितकुमार म्हणाले, समाजात अनेक विचारवंत असून, त्यांचा अभ्यास नाही, जनजागृती नाही म्हणूनच समाजातील हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी देशभरात मोहीम सुरू आहे. ओबीसींनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. आपली संस्कृतीचे महत्त्व ओळखले तरच समाजाबाबत जागरुकता होईल. मंडळ कमिशनच्या वेळीच ओबीसींची जनगणना होणे अपेक्षित होते. पण समाजाची खरी लोकसंख्या समोर येत नसल्याने न्याय हक्क मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अध्यक्षस्थानी महासभेचे राज्य अध्यक्ष ॲड. रघुनाथ महाले, वक्ते प्रा. श्रावण देवरे, ॲड. अंजली साळवे, स्टुडंट्स राईट्स असोसिएशनचे प्रा. उमेश कोरराम, शशिकांत धाडी, किशोर वैती, प्रेमलता साळी, सुधीर सुर्वे आदी उपस्थित होते.

हे ठराव मांडण्यात आले

>> जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव राज्य सरकारने केंद्राला पाठवावा.

>> राज्य स्तरावर जातीनिहाय जनगणना व्हावी.

>> महाज्योती महामंडळास हजार कोटी रुपये देण्यात यावेत.

>> ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे.

>> गायकवाड आयोग, राणे समितीचा अहवालाला विरोध.