टपरी हटवण्यावरून वाद, जालन्यात 55 वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात पेटवून घेतलं

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – रोडवर असलेल्या टपरीच्या वादातून एका इसमाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जालना शहरातील खडकपुरा भागात ही घटना घडली असून या घटनेत हा इसम गंभीररीत्या भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वनाथ उत्तमराव जाधव (वय-55) असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विश्वनाथ जाधव यांची शहरातील अलंकार चौकाजवळ टपरी होती. या टपरीत ते ढोल, तबला सारख्या वाद्यांची दुरुस्ती करून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. काही दिवसांपूर्वी रस्ता निर्मितीच्या कारणामुळे त्यांची टपरी हटवण्यात आली होती.

दरम्यान, काढलेली टपरी पुन्हा त्या जागेवर ठेवण्यास शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने विरोध केला. शेजाऱ्यांनी त्यांच्या टपरीच्या जागेवर एक कार आणून उभी केली होती. याच टपरीच्या वादातून विश्वनाथ जाधव यांनी स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेमध्ये जाधव हे गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जाधव यांनी प्रकृती अत्यवस्थ आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने कारची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.