…तर जनताच त्यांना शिक्षा देते, PM मोदींचे बोट ‘कर्नाटक’कडे मात्र रोख ‘शिवसेने’कडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणूका रंगात आल्या आहेत. यावेळी प्रचारात बोलताना पंतप्रधान मोदींनी झारखंडच्या राजकीय आखाड्यातून शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी शिवसेनेवर निशाणा साधत पंंतप्रधान मोदी म्हणाले, कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांचा विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे.

दक्षिण भारतात भाजप आपले पाय रोवत असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी झारखंडच्या बरहीमध्ये म्हणाले, दक्षिण भारतात भाजप कमकुवत आहे असे बोलले जात होते. परंतू कर्नाटकात आलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्याला उत्तर मिळाले. जनतेचा कौल नाकारुन मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणाऱ्यांना जनतेने धडा शिकविला. जनतेने लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले. पोटनिवडणुकीत भाजप सरकार राहणार की जाणार असा प्रश्न उपस्थित होत होता. जनतेने याला उत्तर दिले.

कर्नाटकात जनतेने कॉंग्रेसला शिक्षा दिली असे सांगताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने कर्नाटकात भाजपाला सरकार बनवू दिले नाही, त्यांना जनतेने शिक्षा दिली. कर्नाटकात स्थिर आणि विकासासाठी भाजपाला विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. या 15 जागांवर गेल्या 70 वर्षांपासून भाजपचा विजय झाला नव्हता. मात्र गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने तेथे भाजपचे कमळ फुलविले. काँग्रेस कधीही आघाडी धर्माचे पालन करत नाही, भ्रष्टाचारासाठी काँग्रेस कोणत्याही मर्यादा पार करु शकते. झारखंडच्या जनतेने कर्नाटकचा निकाल लक्षात ठेवावा.

कर्नाटकात पोटनिवडणूका पार पडल्या. यात भाजप 15 पैकी 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने पहिला विजय नोंदवला देखील आहे. येल्लापूर मतदारसंघाची जागा भाजपने 31 मतांनी जिंकली आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 12 बंडखोर आमदारांना भाजपने निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. ज्याचा फायदा आता भाजप घेत आहे.

कर्नाटक विधानसभेचा सत्तासंघर्ष जवळपास महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासारखा होता. ज्या प्रकारे येडीयुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची दोनवर्षांपूर्वी शपथ होती. परंतू अपुरे संख्याबळ असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. अगदी तसेच महाराष्ट्रात फडणवीस यांच्याबाबत देखील झाले. भाजप महाराष्ट्रात कर्नाटक प्रमाणेच मोठा पक्ष ठरला. परंतू कर्नाटकात सत्तास्थापन काँग्रेस-जेडीएसने केले. परंतू आता येडीयुरप्पांनी काँग्रेसचे आणि जेडीएसचे आमदार आपल्या बाजूला वळवून घेतले आणि त्यांना राजीनामा द्यावयास सांगितले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आणि जेडीएस आणि काँग्रेस यांची आघाडी तुटली. आता भाजपला या पोटनिवडणूकीत कितपत फायदा मिळतो हे पाहावे लागेल.

Visit : Policenama.com