दहावी बारावीचा ‘तेरावा’ घातला, आता मुलांना चांगले जगू द्या : दिग्दर्शक केदार शिंदे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 34 वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून दहावी आणि बारावी या बोर्डाचे महत्त्व आता कमी होणार आहे. या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं स्वागत करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी भूमिका मांडली आहे.

केंद्र सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिल्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या नव्या धोरणाविषयी ट्विट करून मत मांडले आहे. दहावी बारावीचा तेरावा घातला शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटते पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

दोन्ही शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येणार आहे. शालेय शिक्षणाची रचना आता 10 + 2 ऐवजी 5 +3 +3 +4 अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची 4 वर्षे नववी ते बारावी अशा 15 वर्षांंमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे.