देवाकडे मागणे मागायचे ना ! मग समर्थ रामदासांनी शिष्यांना केलेलं मार्गदर्शन काय आहे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे मानले जाते. रामदास स्वामींनी (samarth-ramdas-swami) भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे अनेक शिष्य घडवले आहेत. एक दिवस ते आपल्या शिष्यासोबत मठात बसले असतानाच्या एक प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. नेमके काय घडले? जाणून घेऊ या…

समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत, तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एकदा न राहून एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला की, आपण देवाचे नामस्मरण करताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित का होत नाही, मनात आपण नेमका काय विचार करता? मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही आपल्या, हे कसे शक्य होते? असे अनेक प्रश्न शिष्याने समर्थांना विचारले.
त्यावर समर्थ रामदास स्वामी म्हणाले की, एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुक उभा असलेला पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही कपडे नव्हते. अनेक दिवसांपासून तो जेवलेला नव्हता हे स्पष्ट दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. शारीरिक कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा काय राहू शकत होता, याचे आश्चर्य वाटत होते. केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता. तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे ?

त्यावर भिक्षुकाने उत्तर दिले की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल, तर माझे शब्द ती सांगायला कसे पुरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पुरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले.