मुख्यमंत्री साहेब ‘तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार’ असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपने युतीत न घेतल्याने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. त्यावेळी सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असणार आहे. रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आत्तापण दोन वेळा आला, त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्याच. आजही शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे सेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या असे मी त्यांना म्हंटले आहे असे महादेव जाणकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, संध्याकाळपर्यंत थांबा, तिकडून काय निर्णय येतो हे पाहू आणि मग पुढचा निर्णय घेऊ असेही त्यांनी बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना म्हंटले.

याचबरोबर मला आता मंत्रिपदही नको, एकदा मांडवाखाली जाऊन आलो आहे. आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावे. सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले होते, मी त्यांना भाजपमध्ये जा असे सांगितले. तिथे तुम्हाला चांगले दिवस येतील आणि तो बिचारा भाजपत गेला असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आगामी लोकसभा माझा पक्ष युतीत सोबत असतांना मी तुमच्या चिन्हावर कसं लढणार? तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं. ज्या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाचे चिन्ह असते, त्याला युती म्हणतात. तुम्ही जे म्हणताय त्याला युती नाही बेकी म्हणतात. त्यामुळे आपण ३०-३५ वर्षांपासून वाढवलेल्या पक्षाच्या चिन्हावर जागा लढवणार असल्याचा इशाराही महादेव जानकर यांनी युतीला दिला.

तसेच युतीतून आपल्याला बेदखल करण्यासाठी ही व्यवस्था उभारली जात आहे का? असे नसेल तर शिवसेना आणि भाजपाकडून त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. याचबरोबर युद्धात हरलो तरी तहात जिंकावे लागेल. ही वादळापूर्वीची शांतता आहे हा पक्ष कोणाच्या मेहेरबानीवर चालत नाही. आपल्याला संयमाने काम करावे लागेल. पक्ष आणि संघटना वाढीवर भर द्यायला हवा. जातीच्या चौकटीबाहेर पडून पक्ष वाढवावा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.