प्रेमयुगुलाची आत्महत्या ! नातेवाईकांनी केली नव्हती ‘मिसिंग’ची तक्रार

बीड : माटेगाव (ता. गेवराई) शिवारातील विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चकलांबा पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले.

शुभम कापसे (वय-18, रा. भाट अंतरवाली) आणि कावेरी खंदारे (वय-18, रा. पाथरवाला खुर्द, राहणार माटेगाव) असे या प्रेमयुगुलांचे नाव आहे. शुभम आणि कावेरीनं प्रेम प्रकरणातून आत्महात्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मागील तीन दिवसांपासून शुभम आणि कावेरी बेपत्ता होते. याबाबत चकलांबा पोलिस स्टेशनमध्ये दोघांच्या नातेवाईकांनी हरविल्याची तक्रार दिली नसल्याचे समोर आले. शुभम आणि कावेरीचे एकमेकांवर प्रेम असावे. मात्र, दोन्ही घरातील सदस्यांना ते मान्य नसावे. त्यातून दोघांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडेला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी विहिरीतील दोन्ही मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी पाठविले आहे.

कावेरीला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र, कावेरीचं शुभववर प्रेम होते. त्यामुळे ती आणि शुभम गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. दोघांच्याही नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता.

शेवटी मंगळवारी माटेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. परंतु, दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार का दाखल केली नाही, याचाही चौकशी पोलीस करत आहेत.