‘मी पुन्हा येईन म्हणालो, पण ‘टाईम’ नाही सांगितला त्यामुळं वाट बघा’, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर फडणवीसांचा ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले परंतु फडणवीसांचे अभिनंदन करताना सत्ताधारी नेत्यांनी कौतुक करत काही हास्यास्पद चिमटेही काढले आणि मिश्किल टीप्पण्या देखील केल्या. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अभिनंदनाचे ठराव चांगलेच होते, काही भाषणं अशी होती त्यामध्ये खोचक कौतुक करण्यात आलं. फडणवीसांनी देखील खोचक टीकेला प्रत्युत्तर देत म्हटलं की, मी पुन्हा येईन म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा आणलं, सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिलं. पण जनादेशाचा सन्मान आपण ठेऊ शकलो नाही. लोकशाहीत अशा गोष्टी होत असतात. मी पुन्हा येईन सांगितले पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं म्हणून काही वेळ वाट बघा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना टोला लगावला आहे आणि आपल्या ‘पुन्हा येईन’च्या विधानाला दुजोरा दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती पण काल दुर्दैवाने करता आली नाही. अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतोय, प्रेमाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध राजकारणापलीकडे असतात. त्यांनी जनतेच्या हितासाठी ज्या काही योजना केल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू असे फडणवीसांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षात काम करणं हा आमचा डीएनए आहे, नियम पुस्तिकेच्या बाहेर मी कधीच गेलो नाही, संविधानाच्या आधारे काम करतो, सभागृहात जे मुद्दे काल मांडले ते संविधानाच्या आधारे मांडले. नियमाचे पुस्तक आणि संविधान यापुढे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही असं देखील त्यांनी सांगितले.
Devendra Fadanvis
तसेच बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावं आम्हाला वंदनीय आहेत त्यामुळे कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास कसलीही मनाई नाही, आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. त्यामुळे ही नाव कधीही कुणीही घेऊ शकतं. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे, त्याला अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण तसे झाले नाही त्यामुळे हे नियमाविरुद्ध आहे असे त्यांनी सांगितले. शपथ घेताना संविधानाची तरतूद न पाळल्यामुळे त्यांनी प्रश्न उभा करत विरोधकांना नियमाला धरून काम करण्याचा सल्ला दिला. तसेच जेव्हा जेव्हा नियमाला धरुन काम होणार नाही तेव्हा तुम्ही कितीही रागावला तरीही मी मला दिलेल्या जबाबदारीचे भान ठेऊन, नियमाला धरून संविधानाला अनुसरून काम करत राहील असे सांगून त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले.

त्याचबरोबर संविधानाचे महत्व सांगत संविधानामध्ये खूप शक्ती आहे आणि संविधानाची ताकद खूप मोठी आहे. विरोधी पक्ष हा आमचा शत्रू नाही तर वैचारिक विरोध म्हणून आपणं इथं बसलो आहोत. जे मित्र होते ते एकमेकांसमोर बसले आहेत, जे विरोधात होते ते सत्तेत बसले आहेत. तसेच फडणवीसांनी म्हटले की, लोकांनी आम्हाला जनादेश देऊनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही पण ४० टक्के मार्क मिळून तिघं एकत्र आले अन् १२० टक्के सांगितले असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

तसेच जनतेच्या प्रश्नावर आम्ही कधीही आपल्यासोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज दिला तरीही आमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. जनतेच्या हिताविरोधात असेल तर सरकारवर आसूड ओढण्याचं काम नक्कीच करू असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. एकंदरीत शिवसेनेसमोर आता मोठे आव्हान असणार आहे आणि ते पेलणे खूप अवघड जाणार आहे याचे ही संकेत फडणवीसांनी आपल्या भाषणात दिले.

Visit : Policenama.com