अग्रलेखावरून उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर नाराज ? चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून छापून आलेला अग्रलेख चर्चेचा विषय बनला आहे. या अग्रलेखावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

सामनातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना प्रवक्ते निलम गोऱ्हे यांनी जाहीर केले आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ” शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतुन ठरत असतात.पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतीमत: ठरतात. आजची दैनिक सामनाच्या संपादकीयातील भुमिका  चर्चेतुन आली आदेशातुन. त्यामुळे कदाचित हे चालु घडामोडींवर वैयक्तिक मत असेल शिवसेना पक्षाची अधिकृत भुमिका नाही. असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या स्पष्टीकरणामुळे सामनाचे संपादकीय लिखाण शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय न घेता लिहलं जातंय का…? तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता परस्पर अग्रलेख लिहीले जातायत का…? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय आहे ‘सामना’च्या अग्रलेखात ?

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकराने खबरदारी म्हणून बुरखा किंवा नाकाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मोदींना आपल्या अग्रलेखातून हा सवाल केला आहे.

भारतात ‘बुरखा’ ,’नकाब’ ला बंदी करावी

त्यांनी पुढे आपल्या अग्रलेखात म्हंटले आहे की, ” हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’ विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत”. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.