‘महात्मा गांधींचा स्वातंत्र्य संग्राम’ हे एक नाटक होतं, भाजपच्या ‘या’ खासदारानं तोडले अकलेचे ‘तारे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधींच्या नेतृत्वात भारतात झालेलं स्वातंत्र्याचं आंदोलन एक नाटक असल्याचं विवादास्पद वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलं. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे हेगडे पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर हेगडे यांनी गांधींच्या ‘महात्मा’ या पदवीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कर्नाटक उत्तर कन्ननमधून लोकसभा खासदार हेगडे यांनी बंगळुरु येथील एका जनसभेदरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केलं. यादरम्यान भारताच्या स्वातंत्र्य़ संग्रामाचा उल्लेख करत म्हंटले की, पूर्ण स्वातंत्र्य संग्राम ब्रिटीश सरकारच्या परवानगी आणि समर्थनातून रचण्यात आला. स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान तथाकथित नेत्यांनी एकदा देखील पोलिसांचा मार खाल्ला नाही. गांधींचा स्वातंत्र्य संग्राम हे एक नाटक होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

गांधीचा सत्याग्रह व उपोषण हे एक नाटक –

महात्मा गांधीचे उपोषण आणि सत्याग्रह हे देखील एक नाटक असल्याचे धक्कादायक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. तसेच कॉंग्रेसचे समर्थक म्हणतात की, आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे बरोबर नाही, इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नाही तर इंग्रज निराश झाल्याने भारतातून निघून गेले असल्याचे हेगडे यांनी म्हंटले.

हेगडे म्हणाले कि, जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा मला अत्यंत राग येतो. देशाबाबत असं नाटक करणाऱ्या गांधींसारख्या व्यक्ती आपल्या देशात महात्मा म्हणवून घेतात.