… हे तर मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय, पण 5 वर्ष सरकार टिकणार : दत्तात्रय भरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे हे सरकार दोन महिन्यात जाणार, चार महिन्यात जाणार असे मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे (Mahavikas Aghadi government will last for five years ) टिकणार असे प्रत्युत्तर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच राज्य सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, यावर आज भरणे म्हणाले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विकासाच्या बाबतीत एक वेगळे मॉडेल हे सरकार तयार करेल, हे सरकार पडेल असे वक्तव्य केले जात असले तरी केवळ लोकांना चलबिचल करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. नारायण राणेंनी केलेल्या दाव्याबद्दल विचारले असता मंत्री भरणे म्हणाले की, नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु दर 15 मिनिटाला मी त्यांचे वेगळ वक्तव्य ऐकतो. त्यामुळे राणेंबद्दल त्यांनाच विचारले तर बरे होईल, असे ते म्हणाले.

… तर भाजप निवडून येईल : पाटील
आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले होते. बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे – भरणे
मराठा आरक्षणाबाबत भरणे म्हणाले की, प्रत्येक समाजाच्या लोकांना वाटत आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे, आमच्या तरुणांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत आमचे सरकार सकारात्मक आहे. मात्र ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचा निर्णय सकारात्मक येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.