Maratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा एक भाग, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)मराठा आरक्षणाची (Maratha Reservation)सुनावणी 4 आठवडे पुढं ढकलली आहे. याशिवाय या सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकिल गैरहजर होते. त्यमुळं आता हा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. सरकारवर यावरून टीका होताना दिसत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करत टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देऊन आपल्या युवकांचं भविष्य सुरक्षित करणं हे आपल्या राज्यासमोरील मोठं आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाहीयेत. हे सर्व केवळ राज्य सरकारच्या ढीसाळ कारभारामुळं होत आहे. राज्य सराकर बोलत एक आहे आणि करत एक आहे. आपल्या भवितव्यावर टांगती तलवार आहे हे पाहून काही तरूण टोकाचा निर्णय घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जी काही घटना घडली त्यावरून एकच विचार डोक्यात येतो. इतका संवेदनशील विषय असून देखील राज्य सरकार एवढं बेजबाबदार कसं वागू शकतं ?” असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढं पाटील म्हणाले, “तात्पुरती स्थगिती उठवण्यासंदर्भातील सुनावणी अचानक ठरली नव्हती. ती पूर्वनियोजित होती. तरीही एवढ्या महत्त्वाच्या विषायसंदर्भातील सुनावणीदरम्या राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेला वकिल गैरहजर असणं याहून दुसंर बेजबाबदारपणाचं उदाहरण शोधून सापडणार नाही. तांत्रिक अडचणींमुळं वकिल गैरहजर राहिला असं बाळबोध स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. यांच्या स्पष्टीकरणावरून आणि एकंदरीत कारभारावरून त्यांना मराठा समाजाप्रति किती आत्मियता आहे दिसून येतं.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पाटील असंही म्हणाले की, “आपण सर्व भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा समजतं की, काँग्रेसला कधीही मराठा समजाला आरक्षण द्यायचं नव्हतं आणि आताही द्यायचं नाही. सुनावणीदरम्यान वकिल उपस्थित नसणं हा त्याच कटकारस्थानाचा एक भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे. ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही.”