‘आपल्या रामाचा वनवास संपला, स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. उद्या (बुधवार) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपजन होणार आहे. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. अयोध्येत जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अलिकडेच हिदुत्वाच्या दिशेने राजकीय भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना मांडल्या आहेत. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, जवळपास तीन दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

आपल्या रामाचा वनवास संपला, उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमीपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत. त्यापैकी हा एक क्षण असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं ते प्रतिक आहे. कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीच, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्त्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता. त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवाकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्यासोबत यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या कोरोनाचे संकट आहे. पण ज्या इच्छाशकतीने कोट्यावधी भारतीयांनी राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल याची मला खात्री आहे. तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.