‘आम्हाला खलनायक बनवू नका’ : राजू शेट्टी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीच्या जागेवरून मतभेद निर्माण झाले असतील तर अशी जागा आम्हाला लढवाची नाही असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. तसेच या जागेवरून आम्हाला खलनायक बनवू नका. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील आणि स्वाभिमानी ती जागा सोडून देईल असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. सांगलीच्या बदल्यात वर्धा आणि शिर्डी घ्यायला आम्ही तयार आहोत असे देखील राजू शेट्टी म्हणाले आहेत.

सांगलीचा वाद उद्यापर्यंत मिटवावा आणि आम्हाला निश्चित काय ते सांगा असे पत्रकार परिषद घेऊन राजू शेट्टी यांनी काँग्रेसला सुनावले आहे. त्याचप्रमाणे आम्ही भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याला एकटे देखील निवडणूकीला सामोरे जाऊ शकतो. सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर ती सन्माने आणि तेथील वाद मिटवून द्यावी. तुमच्यात सांगलीच्या जागेवर एकमत होत नसेल तर सांगलीच्या बदल्यात आम्हाला शिर्डी द्या असा पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.

आम्हाला खलनायक बनवू नका…

वसंतदादांच्या घराण्यावर अन्याय केला जातो आहे असे सध्या दर्शवण्यात येत आहे आणि विनाकारण खलनायक स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बनवले जात आहे. आम्ही सांगलीच्या बदल्यात वर्धा अथवा शिर्डी घ्यायला तयार आहोत. विनाकारण शेतकरी संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी काँग्रेसला दिला आहे.