‘महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सारथी संस्थेच्या बैठकीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत बसण्याकरिता स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या काही समन्वयकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. नंतर, बैठक पार पडल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे, असे म्हणत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाकडून सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सारथी संस्थेबाबत महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ केला. छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान दिलं जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न काही मराठा समन्वयकांनी यावेळी उपस्थित केला. तेव्हा संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भमिका घेतली. या बैठकीदरम्यान सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे काम मार्गी लागलं हे महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

“माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे ! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतःपेक्षा रयतेला महत्व देणारे उज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे.” अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच, छत्रपती घराण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल, असे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. समाजाने सारथीचा लढा सुरु केला होता, त्याच्या पूर्ततेला सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वानी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचे छत्रपती घराण्यावर असलेला विश्वास जपण्याचा मी प्रयत्न करेल, असे देखील शिवभक्तांना उद्देशून संभाजीराजे छत्रपती म्हणाले.