‘भाजपावर आरोप करणार्‍या काँग्रेस नेत्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज’ : देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानात सत्तासंघर्ष घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी 500 कोटी जमवले असा आरोप करणार्‍या काँग्रेस नेत्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस हे सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन दिवसांमध्ये काय घडलं याबाबत एका वृत्तवाहिनीशी चर्चेत सावंत यांनी आरोप केला होता.

महाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी 500 कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या. प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते काहीही बडबड करतात. यांचे आरोप कुणाला खरे वाटणार? असे कुठे घडते का? खरेच मला वाटते की ज्या काँग्रेस नेत्याने हा आरोप लावला आहे त्याला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.

दरम्यान, राजस्थानात ऑपरेशन लोटस राबवण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने मुंबईतल्या व्यावसायिक आणि बिल्डर यांच्याकडून 500 कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कालच केला होता. काँग्रेसने आधी तिघाडी सांभाळावी. भाजपाची चिंता करु नये आम्ही आमच्या जागी भक्कम आहोत असे म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.