पंडीत दिनदयाळ उपाध्याय विमा कवच योजना सव्वादोन महिने विलंब झाल्याने विस्कळीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी नियमीत मिळकतकर भरणार्‍या मिळकत धारक व त्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांपर्यंत विमा कवच देण्याच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय विमा कवच योजनेसाठी विमा कंपनीची नियुक्ती करण्यासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. वास्तविकत; या योजनेची मागील वर्षीची मुदत २७ मे रोजी संपुष्टात आली असून अद्याप नवीन कंपनीची नियुक्ती न झाल्याने २७ मे नंतर विमा कंपनीची नियुक्ती होईपर्यंतच्या कालावधीत कुठल्या मिळकतकर धारक अथवा त्याच्या कुटुंबियासोबत अनुचित घटना घडल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने दोन वर्षांपुर्वी नियमीत मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारक व त्यांच्या कुटुंबियांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय विमा कवच योजना सुरू केली. आर्थिकवर्ष सुरू होताना १ एप्रिल ते ३१ मार्च अशी या योजनेची मुदत आहे. मात्र २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने वेळेत कंपनी नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने दि. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीलाच एक्सटेशनचे पत्र देण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतर २८ मे रोजी निविदेनुसार पुन्हा याच कंपनीला काम देण्यात आले होते. दरम्यान, याची मुदत यावर्षी २७ मे रोजी संपली. यानंतर जूनमध्ये प्रशासनाने विमा कंपनी निुयक्तीसाठी निविदा काढली. २६ जूनला या निविदेची मुदत संपली. यामध्ये दोनच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यातील एक कंपनी दि. युनायटेड इन्शुरन्स कंपनी ही या योजनेसाठी पात्र ठरली. मात्र, आजतागायत ब पाकीट न उघडले नाही. काही तांत्रिक कारणास्तव प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया रद्द करून ङ्गेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

आगाउ सूचनेशिवाय अथवा पॉलिसी संपल्यानंतर पॉलिसी रिन्युअलसाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी विमा कंपन्यांकडून देण्यात येतो. परंतू हा कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक झाल्याने कुठलिही कंपनी मागील तारखेपासून एक्स्टेंशन देत नाहीत, अशी माहिती विमा क्षेत्रातील जाणकांरांनी दिली आहे. त्यामुळे २७ मे ते ङ्गेरनिविदा प्रक्रिया होउन प्रत्यक्ष प्रिमियम भरेपर्यंतच्या कालावधीमध्ये या योजनेसाठी पात्र असलेल्या मिळकतधारकाच्या कुटूंबात अनुचित घटना घडल्यास त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

पंडीत दिनदयाळ विमा योजनेसाठी काढलेल्या निविदेला दोन विमा कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी एक कंपनी अपात्र ठरली आहे. तर दुसर्‍या कंपनीचे ब पाकीट उघडलेले नाही. तांत्रिक कारणास्तव ही निविदा रद्द करण्यात आली असून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागीलवर्षी हे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती सरकारी विमा कंपनी आहे. त्या कंपनीने २७ मे पासून एक्स्टेंशन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कुठलिही अडचण येणार नाही.