‘… तर भारत पाकिस्तानला संपवून टाकेल’ : परवेझ मुशर्रफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे ही मागणी जोर धरू लागली. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात आणखीच तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. शिवाय भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवातही केली आहे. अशातच आता भारत हा पाकिस्तानला संपवून टाकू शकतो अशी भीती पाकिसतानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने भारतावर एकही न्यूक्लियर बॉम्ब टाकला तर भारत पाकिस्तानवर 20 न्यूक्लियर बॉम्बने हल्ला करू शकतो असं ते म्हणाले आहे.

तर भारत पाकिस्तानला संपवेल

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भारत-पाकिस्तान संबंध धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत. आपण भारताविरोधात अण्वस्त्र वापरले तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवेल.” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. एका पाकिस्तानी वृत्तपत्रानेही याबाबत वृत्त दिले आहे.

‘तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? ‘

पुढे बोलताना मुशर्रफ म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला करावा हा एकमेव तोडगा आहे. पाकिस्तानने भारतावर 50 अणूबॉम्ब टाकले तरच भारत 20 अणूबॉम्ब वापरण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? असा सवाल मुशर्रफ यांनी विचारला.

‘जवानांबद्दल मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत’ : मुशर्रफ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही. असा आरोप मुशर्रफ यांनी मोदींवर मागील आठवड्यात केला होता. इतकेच नाही तर, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप देखील त्यांनी फेटाळून लावत , पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन केले होते. दरम्यान मुशर्रफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला सुरू आहे . असेही समजत आहे. मुख्य म्हणजे ते ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) चे प्रमुख आहेत. मुशर्रफ सध्या दुबईत वास्तव्यास असून त्यांनी 2016 मध्येच पाकिस्तान सोडला आहे.