गडचिरोली नक्षलवादी हल्ला प्रकरण : पोलीस अधिकारी सक्तीच्या रजेवर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली येथील जांभूळखेडा येथे लेंडारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी भूसूरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये वाहन चालक आणि १५ पोलीस जवान शहीद झाले होते. यानंतर शहीद जवानांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर आरोपी करत या घटनेला पोलीस अधिकारी शैलेश काळे हे जबाबदार असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर शैलेश काळे यांना जबाबदार धरून त्यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. काळे यांच्या जागेवर धानोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे पदभार देण्यात आला असून या घटनेच्या तपासाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कुरखेडा तालुक्यातील दादपूर परिसरात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या कारवाया फारशा नव्हत्या. १८ वर्षापूर्वी या परिसरात नक्षलवाद्यांनी एकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर अशी कोणतीही घटना या परिसरात घडलेली नाही. मात्र, नक्षलवाद्यांनी १ मे रोजी केलेल्या स्फोटात १५ जवानांना शहीद व्हावे लागले. ही घटना घडल्यानंतर पोलीस सतर्क झाले. नक्षलवाद्यांच्या हालचाली लक्षात आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, याचा तपास आता करण्यात येत आहे.

पोलिसांनी ‘रोड ओपनिंग’ केले नाही
नक्षलवाद्यांनी कोणताही अनुचीत प्रकार केल्यानंतर पोलिसांकडून या परिसराची पाहणी केली जाते. पोलिसांकडून ज्या परिसरात प्रकार घडला आहे त्या परिसरातील २० ते २५ किलोमीटरची तपासणी केली जाते. पोलिसांच्या भाषेत याला ‘रोड ओपनिंग’ असे म्हटले जाते. १ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटानंतर पोलिसांनी या भागाची तपासणी केली नाही. तपासणी न करताच पोलिसांचे १५ जणांचे पथक दादापूर येथे झालेल्या जाळपोळीच्या ठिकाणी जात होते.