सदाभाऊंचा राजू शेट्टींवर निशाणा, म्हणाले – ‘हा कडकनाथ कोंबडा सारखा पहाटे आरोळी ठोकतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली होती. त्यावर ‘सदाभाऊ खोत जिवंत असेपर्यंत तुमच्या संघटनेत परत येणार नाही,’ अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खडसावले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “भाजपवर माझा राग कधीच नव्हता. संघटना वाढवण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपनेच मदत केली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोट ठेवून आम्ही पुणे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपविरुद्ध उमेदवार उभा केला. केंद्राचे कृषी कायदे डोळ्यांसमोर होते. पण आता आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. घटकपक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत आहोत, समाधानी आहोत, एकत्र राहून सरकारविरुद्ध काम करणार.”

वाघाचे बछडे लांडग्यांच्या वळचणीला जाणार नाहीत

ऊसदराबाबत तुमची आणि राजू शेट्टी यांची भूमिका एकच आहे, मग दोघे एकत्र लढा देणार का, असा प्रश्न विचारला असता, मी म्हणाले की, ते प्रस्थापितांच्या बाजूने आहेत, लुटारूंच्या बाजूने आहेत. त्यांनी बाजू सोडावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावं. मात्र, त्यांना आमचे सहकार्य नको असेल, तर ठीक आहे. पाठिंबा घ्यावाच, असा आमचा काही जोर नाही. पण आम्ही पुढे केलेला मदतीचा हात त्यांनी झटकला, असं निर्माण केलेलं वातावरण अयोग्य आहे. आम्ही मजबूत आहोत. सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांतीतील वाघाचे बछडे लांडग्यांच्या वळचणीला जाणार नाहीत,” असा निशाणा खोतांनी साधला.

राजू शेट्टी सदाभाऊ खोतांना काढून टाकले असे सांगून स्वतःचे महत्त्व वाढवत आहेत. मात्र, ज्यांनी मला काढलं, तेदेखील तुमच्यासोबत नाहीत. हा सदाभाऊ खोत जोपर्यंत जिवंत आहे, तुमच्या संघटनेत परत येत नसतो, असेसुद्धा खोत म्हणाले.

कडकनाथ कोंबडा सातत्याने आरोळी ठोकतो

माझी ईडी चौकशी हवी, म्हणून शेट्टी वाजतगाजत गेले, मात्र काही हाती लागले नाही. दुसऱ्यांचे घोटाळे माझ्या नावावर खपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपण मात्र स्वच्छ, गोमूत्र शिंपडल्यासारखे आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता. परंतु, कागदपत्र असतील तर भर चौकात या, हे आम्ही नेहमीच सांगतो. कडकनाथ कोंबड्यांचा हा कडकनाथ कोंबडा सातत्याने पहाटे आरोळी ठोकतो. हा वैफल्यग्रस्त माणूस फक्त आरोप करतो. मलाही खोटे आरोप करता आले असते, पण पाठीत खंजीर खुपसणारा मी नाही, असे म्हणत खोतांनी राजू शेट्टी यांना झापलं आहे.