दिल्लीनं ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानं येथील ‘चंबुगबाळे’ आवरा, संजय राऊतांचा मिडीयाला सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या चर्चा आणि सोमवारपासून सुरु झालेले संसदेचे अधिवेशन यामुळे महाराष्ट्रातील अनेक चॅनेलचे पत्रकार, कॅमेरामन तसेच विविध वृत्तपत्राचे पत्रकार हे मुंबईतून दिल्लीला गेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका दिल्लीत होत आहेत. आता मात्र, दिल्लीतील काम संपले असून या पुढील घडामोडी मुंबईत घडतील. तेव्हा आता दिल्लीतील चंबु गबाळे आवरा आणि मुंबईकडे कुच करा असा सल्ला मिडियाला विशेषत: मुंबईतून आलेल्या पत्रकारांना संजय राऊत यांनी दिला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यावर सहमती झाल्याचे सांगितले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत होणार आहे. दिल्लीतून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शिवसेनेबरोबर जाण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील घडामोडी होणार आहे.

या दृष्टीने संजय राऊत यांनी सांगितले की, दिल्लीतील काम आता संपले आहे. या पुढील घडामोडी मुंबईत होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतून पुढील घोषणा करतील. तेव्हा आता दिल्लीतून तुम्ही मुंबईला परत जाण्यास हरकत नाही,असा सल्ला राऊत यांनी देताना यापुढे सर्व घडामोडी मुंबईत होणार असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com