सातारा लोकसभा पोटनिवडणूक : ‘या’ कारणामुळं उदयनराजेंची ‘डोकेदुखी’ वाढली !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे उदयनराजेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मतदानाचा वाढलेला टक्का हा प्रस्थापित उमेदवारासाठी धोक्याची घंटा मानली जाते. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आली असताना उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली असून राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे रिंगणात होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात 60 टक्के मतदान झालं होतं. मात्र आता पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढून जवळपास 65 टक्क्यांपर्यंत पोहोचली. हा वाढीव टक्का हा प्रस्थापित उमेदवारासाठी धोक्याची घंटा मानला जातो. उदयनराजे भोसले यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याच सुरुवातीपासूनच बोललं जात आहे.

विधानसभा निवडणूकीच्या आधी या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दोन्ही राजे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. शरद पवार यांची साताऱ्यातील सभा चर्चेचा विषय ठरली होती. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी मतदारांना भावनिक साद घातली होती.

Visit : Policenama.com