Coronavirus : सातारा जिल्ह्यातील मृत्यू दर वाढला !

सातारा : पोलिसनामा ऑनलाइन – सातारा शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांमध्ये २७६ ने वाढून ४२२ वर पोहचली आहे. तर एकूण १५ मृत्यूंपैकी या कालावधीत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुरुवातीच्या काळात तीन पेक्षा कमी असलेल्या मृत्युदरात या आठ दिवसांच्या कालावधीत ४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे.

लॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर कोरोना संसर्ग नसलेल्या नागरिकांना आरोग्य तपासणी करून कोणतेही लक्षण नाहीत ना, या प्रमाणपत्रावर आपल्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ई-पासच्या आधारे आलेल्या नागरिकांची संख्या १ लाखांच्या वरती आहे. त्यात सर्वाधिक मुंबईहून आलेल्या नागरिकांचा सहभाग आहे. तसंच मुंबई आणि गुजरातवरून आलेले काही जण कोरोना संसर्गाचे वाहक असल्याचं समोर येत आहे. २२ मार्च पासून एक दोन करत मागील आठवड्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग नियंत्रित असून, रुग्णसंख्या दीडशेच्या आसपास होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांनी ४०० चा टप्पा पार केला. दररोज रुग्णसंख्येत भर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. तर रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १९ मे पर्यंत १४६ होती. ती कालपर्यंत (दि.२७) संसर्गित रुग्णांची संख्या ४२२ पोहचली. या आठ दिवसांच्या कालावधीत एकूण २७६ रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने जिल्हा पुन्हा ‘रेड झोन’ मध्ये प्रवेश करतो की, काय अशी भीती निर्माण होत आहे. परंतु, कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येपेक्षा सर्वात जास्त भीतीदायक आहे, ती मृत होणाऱ्यांची संख्या. १९ मे पर्यंत जिल्ह्यात एकूण दोन मृत्यूंची नोंद झाली होती. त्यामुळे मृत्युदर १.७ असून तो आटोक्यात होता. तसेच देश आणि राज्याच्या मृत्युदरापेक्षा तो अत्यंत कमी असल्यामुळे, जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचं कौतुक केले जात होते. मात्र, गेल्या आठ दिवसात हे चित्र बदललं आहे. जशी रुग्णसंख्येत वाढ होऊन २७६ वर पोहचली. तशी मृत्यूच्या संख्येतदेखील वाढ झाली. मागील आठ दिवसांमध्ये १३ जणांचा मृत्यू झालेला असून, मृत्युदर ४.७ वरती पोहचला आहे. मृतांमध्ये वृद्धांचा समावेश असल्याचं दिसून येत, तसेच ५० ते ६० वयोगटामधील नागरिकांचा देखील समावेश आहे.