‘जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले, त्यांनी केलेल्या भाषणावरून शिवसेनेने निशाणा साधला आहे. कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीकडे लक्ष वेधत अर्थव्यस्थेला गती देण्याचा सल्लाही शिवसेनेने त्यांना दिला आहे. आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेह़र्‍यावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.

अशी टीका शिवसेनेने केली. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 50 हजारांवर लोक या महामारीत मरण पावले. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ‘लस’ येत आहे, असे लाल किल्ल्यावरून सांगणे आशादायक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या तीन लसी जोपर्यंत बाजारात येत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थानातील भय संपणार नाही. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते, असा चिमटा शिवसेनेेने काढला आहे.