‘टोलवाटलवी नको, केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टी झालेल्या परिसराचा दौरा करत आहेत. बारामतीमधील उंडवडी गावातील पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये. मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्याने तातडीनं मदत करावी. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावं, असं फडणवीस म्हणाले.

डिफेंड करण हेच शरद पवारांचं काम

तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं शरद पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे, असे फडणवीस म्हणाले.