फायद्याची गोष्ट ! शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारची 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम, शेतकरी सन्मान निधीचा मिळणार लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील ज्या शेतकर्‍यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी आणि नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. तसेच त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा केले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत, त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात 1 कोटी 52 लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 4 लाख शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्रुटी असलेल्या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दुरुस्ती करावी, यासाठी 23 जुलै ते 5 ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम राबवून माहितीतील त्रुटी दूर करून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

या कालावधीत सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकर्‍यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात. तसेच शेतकर्‍यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. कोरोना संकटाच्या काळात 1 एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 2441 कोटी रक्कम थेट जमा केली आहे, असेही असेही त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. याच काळात शेतकर्‍यांचेही हाल होत आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. यात काही कंपन्यांनी राज्यात शेतकर्‍यांना न उगविणारे बिया दिल्या जात आहेत. शेतकर्‍याला यातील काहीच माहित नसल्यामुळे बरेच शेतकरी यात फसत आहेत. त्यामुळे फसवणूक करणार्‍या कंपन्याविरोधातही कारवाई करण्याची मागणीही शेतकर्‍यांकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘हि’ विशेष मोहिम आणली आहे. त्यामुळे याचा भरपूर शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे.