रेल्वेखाली तिघांची आत्महत्या ; दौंड – मनमाड रेल्वेमार्गावरील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड मनमाड रेल्वे मार्गावर वांबोरी शिवारात अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस खाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात माय-लेकासह एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

वर्षा गिरीराज तिवारी-ठुबे (वय ४३), मुलगा अनुप गिरीराज तिवारी (वय ९, दोघे रा. केडगाव) ही मयत माय-लेक आहेत. आणखी एक 52 वर्षीय महिलेचा समावेश असून, तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अमरावती-पुणे एक्स्प्रेस सुपरफास्ट रेल्वे नगरच्या दिशेने येत होती. तिच्याखाली वांबोरी गावाजवळ वर्षा, अनुप व एका महिलेने उडी मारली. रेल्वेखाली सापडून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध सुरू आहे.