भाजपच्या लोकांपासून महिलांना सर्वाधिक धोका : रुपाली चाकणकर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील महिलांना भाजपच्या लोकांपासून धोका आहे. महिला सुरक्षेवरून राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृहंत्रीपद असताना महिला संरक्षणासाठी कोणता कायदा आणला ? महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्यांना फडणवीस यांनी अगोदर सुधारावे. महाराष्ट्र आपोआप सुधारेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आढावा बैठक आणि महिला मेळावा राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.फौजिया खान यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी इच्छुक महिला उमेदवारांशी चर्चा केली. या कार्यक्रमाला महिला शहराध्यक्ष मेहराज पटेल, छाया जंगले, प्रतिभा वैद्य, वीणा खरे, वंदना चौधरी, अश्विनी बांगर, मंजूषा पवार उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेत्यावर टीका केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अत्याचाराच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर टीका करीत आहेत. फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना पाच वर्षांत किती महिलांवर अत्याचार झाले त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. गंभीर घटना घडल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली ? असा सवाल चाकणकर यांनी केला. राज्यात महिला अत्याचार वाढले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘दिशा’ कायदा राबवून कारवाई करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकानिहाय महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. समिती पीडितांना पाठबळ देणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

तसेच महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच योजना जाहीर होणार आहेत. बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यात येणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत. या नेत्यांना फडणवीस यांनी सुधारावे. महाराष्ट्रातील लेकींना सर्वाधिक भीती भाजपच्या लोकांपासून आहे. महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल असा टोला त्यांनी भाजला लगावला.
जयभवानी नगर येथील मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये अर्चना गवळीसह शिवकन्या गवळी, सिंधू गवळी, मंगल जायभाय, सविता खोसे, रुख्मिणी खोसे, पूजा शिंदे, विद्या काकडे, शकुंतला गवळी, मंदा गायके, उषा पालवे, जया राजकुंडल, बेबीताई वेताळ, मीना सावळे यांनी प्रवेश केला. माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतील रिक्त जागेसाठी उमेदवारी दिली आहे, याबद्दल खान यांनी समाधान व्यक्त केलं आहे.