‘सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कंबरडं मोडलं. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेली. शेतकरी संकटात सापडलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने राज्यातील विरोधी पक्षाने (BJP) महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पडकलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना राज्य सरकार कमी मदत करत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

जे करायचंय ते ठोस करु, दसरा-दिवाळीच्या सण तोंडावर आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत. कोणतंही सोंग करता येत, पैशाचं नाही. केंद्राकडे जीएसटीचे (GST) पैसे थकित आहेत, ते अद्याप आलेले नाहीत. शेतकऱ्यांना शक्य ती, जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असून मुंबईत त्याच काम सुरु आहे. येत्या दोन दिवसांत मदती संदर्भात घोषणा करु, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे अद्याप केंद्राकडून आलेले नाहीत. ते आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिक मदत होईल. पण तोपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते केलं जाईल. काही दिवसांमध्ये दसरा येतोय, त्यानंतर दिवाळी (Diwali) येतेय. सणासुदीला (festival) राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही ही माझी जबाबदारी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा बिल्ला मी शोभेसाठी खिशावर लावलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.