31 मार्चपर्यंत मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात लागू असलेलं कलम 144 म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरना व्हायरसचा लाखो लोकांना संसर्ग झाला आहे. तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरातील 176 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाला असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबईमध्ये दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईत 31 मार्च पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर कोणीही पॅनिक होऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, जमावबंदी म्हणजे नेमके काय, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

जमावबंदीचे कलम 144 आहे तरी काय ?
कलम 144 हे फौजदारी दंडसंहिता 1973 मधील कलम आहे. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची किंवा दंगलीची संभावना असेल, मानवी जीवाला आणि आरोग्याला धोका असेल. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्तीत जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

हा आदेश कोण लागू करतं ?
जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात. यात अधिकारी फौजदारी दंडसंहिता 1973 मधील कलम 134 अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठराविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात. मात्र, यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तिंवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना देखील बजावली जाऊ शकते.

कोणत्याही भागामध्ये दोन महिने किंवा अधिक काळासाठी जमावबंदीचा आदेश लागू करता येतो. एखाद्या ठिकाणी दोन महिने जमावबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने जमावबंदीचा आदेश काढता येतो. पण जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही जमावबंदी सहा महिन्यांपर्यंत लागू केली जाऊ शकते.

मुंबईत जमावबंदी करण्यामागचे कारण
मुंबई हे गर्दीचे शहर आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना व्हायरसमुळे आता संसर्गाची भीती वाढली आहे. शिवाय राज्यातील कोरोना व्हायरसच्या संशयितांची संख्या वाढत असल्याने ही स्थिती लक्षात घेऊन मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ग्रुप टूर्स काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे विदेशात किंवा देशांतर्गत टूर्स आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबई दर्शन टूर्सही 31 मार्चपर्यंत थांबवण्यात आले आहेत.